शाहू महाराजांना देशात एक नंबरच्या मताधिक्क्याने निवडून देऊया : आमदार पी.एन.पाटील ( शिरोली दुमाला येथे जाहीर सभा )

कोल्हापूर : 

राजर्षी शाहू महाराजांच्या सर्वांगीण कार्यामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. हा कार्यांचा व  विचारांचा वारसा घेउन विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती यांनी समाजातील विविध घटकाला हात दिला आहे. ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती कोसळल्या, संकटे उदभवली त्यावेळी मदतीसाठी ते सर्वात पुढे होते. भोगावती परिसरात त्यांनी गोरगरिबांना २४ एकर जमीन दिली. आरे येथे मागासवर्गीय नागरिकांना साडेसहा एकर जमीन मोफत दिली. आंबेवाडी, चिखली येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सोनतळी येथे चौदाशे कुटुंबीयांना विना मोबदला जागा दिली. लातूरमध्ये भूकंप असो, कोल्हापूर महापूर असो तेथे अन्नधान्याचा ट्रक घेऊन पोहोचले. १९८९ मध्ये महापुराची आपत्ती कोसळल्यानंतर शिंगणापूरमध्ये धान्य पुरवठा केला होता. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहुंचा वारसा पुढे नेणाऱ्या  शाहू महाराजांना देशात एक नंबरच्या मताधिक्क्याने निवडून देऊया, असे प्रतिपादन आमदार पी.एन.पाटील यांनी केले. 

शिरोली दुमाला ता. करवीर येथील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. सभेचे नियोजन गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांनी केले. यावेळी शिरोली दुमालासह परिसरातील सरपंचांच्या हस्ते शाहू छत्रपती महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

 यावेळी उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीद्वारे आपण योग्य संदेश द्यायचा आहे. सध्या सर्वत्र अस्थिर वातावरण आहे. या कठीण कालावधीत समता आणि सुधारणावादी विचारांना सोबत घेऊन आपणाला वाटचाल करायची आहे. या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, सर्व घटक पक्षानी मिळून शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर केली आहे. देशाचे लक्ष इकडे लागले आहे.त्यामुळे कोल्हापूरच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. गद्दारीचा शिक्का घेऊन फिरणाऱ्यांना चारशे पार नाही तर भाजप तडीपार करूया असा  नारा दिला. 

शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, 

कोल्हापूर जिल्ह्यात आजही छत्रपती घराणे विविध कार्यात, महत्त्वच्या प्रश्नात अग्रेसर राहिले आहे. 

महाराष्ट्रात सत्तेचा उन्माद येऊन पक्ष फोडून विरोधी सरकार सत्तेवर आले आहे. घाणेरड्या राजकारणाला रोखयचे असेल तर शाहू महाराजांना लाखोंच्या लीडने विजयी करूया आणि विरोधी उमेदवाराला दणकून ताकद दाखवूया. 

गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील म्हणाले, महाराजांची लोकप्रियता पाहता त्यांचा विजय निश्चित असून फक्त किती लीड राहते याचीच उत्सुकता राहिली आहे. आम्ही सर्व जण त्यांच्यासाठी प्रचारात सक्रिय राहून आमदार पी.एन.पाटील यांच्या माध्यमातून या भागात लीड द्यायला कमी पडणार नाही. 

दादूमामा कामिरे यांनी अंगावरील कपडे हे राजर्षी शाहू महाराजांची देण आहे असे सांगून आपल्या शेलक्या शैलीत भाजपचा समाचार घेतला. 

करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील, काँग्रेसचे करवीर मतदारसंघाचे निरीक्षक पी.डी. धुंदरे, केरबा भाऊ पाटील, बाजीराव पाटील,  शिरोली दुमाला सरपंच सचिन पाटील, नंदकुमार  पाटील, सरदार पाटील, माधव पाटील, एस के पाटील,  आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. स्वागत प्रास्तविक अनिल सोलापुरे यांनी केले. आभार बाजीराव पाटील यांनी मानले.

————————————————————

उबाठा नेत्यांच्या भाषण स्टाईलचे केले कौतुक…

 सर्वच वक्त्यांनी  खास करून  ठाकरे गटाचे संजय पवार व विजय देवणे यांनी आमदार पी.एन.पाटील यांची करवीरमधील प्रचार यंत्रणा, प्रचंड लोकसंग्रह, काँग्रेस पक्षबांधणीचा विशेष उल्लेख केला. तर पी.एन.पाटील यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आम्हा काँग्रेसच्या मंडळींना एवढे आक्रमक बोलण्याची अजून सवय झाली नाही.  संजय पवार व विजय देवणे ज्या शिवसेना स्टाईलने बोलतात  त्याचे कौतुक करताच उपस्थितानीही टाळ्या वाजवून दाद दिली. 

————————————————————

Share
error: Content is protected !!