कसबा आरळे ते नंदवाळ कार्तिकवारी दिंडी
करवीर :
कार्तिकवारीनिमित्त करवीर तालुक्यातील कसबा आरळे ते नंदवाळ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानोबा-तुकाराम विचार प्रसारक ट्रस्टच्या वतीने आयोजित या सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. तुळशी खोऱ्यातील शेकडो वारकरी, महिला या दिंडीत सहभागी झाल्या होत्या.
शनिवारी कसबा आरळे येथील हनुमान मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडीचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सद्गुरू भावानंद महाराज, चैतन्य महाराज, सदानंद गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी जन्मेजय महाराज चांदेकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.
रविवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी दिंडी मार्गस्थप्रसंगी माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, राजीवजी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील, युवराज भोगम, क्रांतीसिंह पवार पाटील, कुंभीचे संचालक दादासो लाड, कृष्णात मुळीक, विश्वास काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
टाळ – मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा, ज्ञानबा – तुकारामाचा जयघोष करत दिंडी नंदवाळकडे मार्गस्थ झाली. दिंडी मार्गात काकडा, गवळण, हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गांवर अनेक ठिकाणी चहापाणी व भोजन व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी नंदवाळ येथे नामदेव पाटील यांचे हरिकीर्तन झाले.
