कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापूर तसेच अतिवृष्टीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या डीपीआर तयार करावा

मुंबई :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामास सुरुवात केली. त्यांनी आज राज्यात सध्या सुरु असलेल्या तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

या बैठकीत कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील महापूर तसेच अतिवृष्टीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. या योजनेचा डीपीआर तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. ते बैठक संपल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

बोलताना फडणवीस यांनी “आज जागतिक बँकेसोबत आणखी एक बैठक झाली. मागील काळात सांगली आणि कोल्हापूरला पूर आला होता. दरवर्षी असाच पूर आला, तर काय करायचे यावर आपण अभ्यास केला होता. जागतिक बँकेच्या मदतीने आपण एक अप्रुव्हल घेतलं होतं. यामध्ये वळण बंधारे आणि टनेल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला,” अशी माहिती दिली.

सांगली आणी सोलापूर भागातील जे पुराचं पाणी आहे; ते महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या हिश्श्याव्यतिरिक्त आहे. तेव्हा आपण त्यावर अभ्यास केला होता. आज पुन्हा एकदा जागतिक बँकेसोबत आपण बैठक घेतली. त्यांची या प्रकल्पाला मदत करण्याची पूर्ण तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातही निर्देश दिले आहेत. त्यामुळे याचा डीपीआर तयार करुन जागतिक बँकेकडे देण्यात यावा, असे निदेर्शही देण्यात आले आहेत,” असे फडणवीस यांनी सांगितले.

वाहून जाणारे जे पाणी आहे, ते गोदावरीच्या खोऱ्यात नेण्यासंदर्भात याआधी कारवाई केली होती. ती कारवाई पुन्हा सुरु करण्याबाबत आम्ही आढावा घेतला. हे काम टेंडर स्टेजपर्यंत घेऊन जावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वळणगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात गोसीखुर्दच्या खाली वाहून जाणारं पाणी आहे, ते टनेलच्या माध्यमातून ४५० किमी आणायचे नियोजन होते. यामुळे जवळजवळ ५ ते ६ जिल्ह्यांना फायदा होणार होता. त्याचाही आज आढवा घेण्यात आला. हा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेकरीता सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत,” असे फडणवीस यांनी सांगितले.

Share
error: Content is protected !!